खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून टोळी करून सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्याचे आणि जीवघेणे हल्ले करण्याचे प्रकार चिंताजनक बनले आहेत. पुणे पोलिसांच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरून चार अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने हल्ला करून तीन तरुणांना गंभीर जखमी केले. दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ०९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आदर्श कॉर्नर येथील किराणा मालाचे दुकान समोर, जय शंकर पान शॉप शेजारी, मोहन नगर, पुणे या सार्वजनिक ठिकाणी हा हल्ला झाला.
फिर्यादी (वय २२ वर्षे, रा. राजे चौक, भारती विद्यापीठ मागे, पुणे) यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी अल्पवयीन मुलांनी अडवले. एकूण चार (०४) विधिसंघर्षित बालक (ताब्यात). आरोपी अल्पवयीन मुलांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादींचे दोन मित्र मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांनाही लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केले. आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी लोकांना धमकावून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये चार अल्पवयीन आरोपींविरुद्ध गु.र.नं. ५०२/२०२५, भा.न्या.सं.क. १०९ (गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे), ११५(२) (धारदार शस्त्र बाळगणे), ११८(१) (सार्वजनिक शांततेचा भंग), ३(५) (गुन्हेगारी कट), क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट ॲक्ट कलम ७ (दहशत माजवून गंभीर दुखापत), महाराष्ट्र पोलीस अधिनियम (म.पो.अ.) कलम ३७(१)(३) सह १३५ (शस्त्र बाळगण्यास मनाई व आदेशाचे उल्लंघन) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात आणि त्यांच्या पथकाने तत्परता दाखवत चारही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कठोर कारवाई करत आहे.






